छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी – मराठा समाज ओबीसी आरक्षणात “घुसखोरी” करत असल्याची टीका मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच केली होती. यावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. “मराठा समाज १८८१ पासूनच ओबीसी आरक्षणात समाविष्ट आहे. त्यामुळे घुसखोरीचा प्रश्नच येत नाही. मंत्री छगन भुजबळ १९९४ मध्ये आले, पण आमचं स्थान आधीपासूनच अधिकृत आहे,” असं जरांगे म्हणाले.
सरकारसोबत चर्चा
शुक्रवारी (दि.५) सकाळी गॅलेक्सी रुग्णालयात माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पुढे म्हणाले –
- “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसकट मराठा आरक्षणाबद्दल बोलत नसले तरी मराठवाड्यातील मराठे आरक्षणात जाणार हे निश्चित आहे.”
- “आम्ही सुधारित शासन निर्णय (जीआर) काढण्याची मागणी केली आहे. आरक्षणाची प्रक्रिया कशी असेल आणि प्रमाणपत्रे कधीपासून मिळणार याबाबत सरकारसोबत चर्चा झाली आहे.”
“जीआर निघाला, अंमलबजावणी होणारच”
जरांगे यांनी भुजबळांना टोला लगावत सांगितले –
“भुजबळ यांना जीआरची चांगली माहिती आहे, कारण त्यांनी मंत्रिपद भूषवलं आहे. पण आता जीआर निघालेला असून त्याची अंमलबजावणी होणार हे निश्चित आहे. मराठा समाजाने शांततेत आंदोलन करून मुंबईत हक्क मिळवला. काही नेते माझ्या विरोधात का बोलतात हे मला समजत नाही, पण आमचा हक्क आम्ही मिळवलाच आहे.”
मंडल आयोगालाच आव्हान
“भुजबळ कोर्टात गेले तरी काही होणार नाही. हैद्राबाद गॅझेट हा सरकारी दस्तऐवज आहे. कोर्टानं काही निर्णय दिला तरी आम्ही मंडल आयोगालाच आव्हान देऊ,” असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.