कल्याण | प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवलीतील महिला बचत गटांनी लाडकी बहिण योजना राबवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली, स्वतःचे मोबाईल आणि रिचार्ज खर्च करून हजारो अर्ज भरले. मात्र, दीड वर्ष उलटूनही त्यांच्या मानधनाचा पत्ता नाही. त्यामुळे या महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासन आणि शासन एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
महत्वाचे मुद्दे:
- ५० रुपये प्रति अर्ज मानधनाचे आश्वासन दिले असतानाही अद्याप पैसे मिळालेले नाहीत.
- रात्री जागून, दिवसा माहिती संकलन करून महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले.
- स्वतःचा मोबाईल, इंटरनेट रिचार्ज वापरून काम केले.
- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महिला व बाल विकास विभागाकडून कामांचे आदेश मिळाले होते.
- शासनाकडून निधी मिळाल्यानंतर मानधन दिले जाईल, असे समाज विकास अधिकाऱ्यांचे म्हणणे.
“सर्व्हर डाऊन, तरीही अर्ज भरले – आता आमचं कोण?”
“आम्ही दिवसा महिलांकडून माहिती घेतली आणि रात्री जागून अर्ज भरले. सरकारने ५० रुपये देतो म्हणाले, म्हणून विश्वास ठेवून काम केलं. पण आता सगळे हात वर करत आहेत. हा अन्याय नाही का?” – दर्शना पाटील, महिला बचत गट सदस्या, डोंबिवली
अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण:
“बचत गटाच्या सदस्यांची माहिती शासनाला पाठवली आहे. निधी आल्यावर मानधन दिले जाईल.”
– प्रशांत गवाणकर, समाज विकास अधिकारी