परळी | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात गाजत असलेल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या प्रकरणात नाव समोर येताच, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले सुशील कराड यांनी आपल्या विरोधात लागलेले आरोप फेटाळले आहेत.
“म्हणजे मारलंच आम्ही?” असा संतप्त सवाल उपस्थित करत, सुशील कराड यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. “हा सगळा प्रकार एक नियोजित राजकीय कट आहे. आम्ही निर्दोष आहोत. आमच्यावर खोट्या तक्रारी दाखल करून आमचं राजकीय व सामाजिक नुकसान करण्याचा प्रयत्न सुरु आहे,” असा दावा त्यांनी केला आहे.
कोण होते महादेव मुंडे?
महादेव मुंडे हे बीड जिल्ह्यातील एक जाज्वल्य सामाजिक कार्यकर्ते होते. विविध अन्याय-अत्याचाराच्या प्रकरणांवर त्यांनी आवाज उठवला होता. काही दिवसांपूर्वी त्यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असतानाच सुशील कराड यांचे नाव संशयित आरोपी म्हणून पुढे आले.
“हत्येचा आरोप म्हणजेच आम्ही गुन्हेगार?”
प्रसारमाध्यमांशी बोलताना कराड यांनी संताप व्यक्त करत म्हटलं, “आम्ही आवाज उठवला म्हणून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. आमच्या पाठीमागे कोणताही गुन्हेगारी हेतू नाही. आम्ही न्यायाची लढाई लढतो आहोत.”
याप्रकरणी त्यांनी CBI चौकशीची जोरदार मागणी केली आहे. “स्थानीय पोलीस प्रशासन आणि राजकीय दबावामुळे खरी माहिती दाबली जातेय. त्यामुळे आम्ही केंद्रीय तपास यंत्रणेकडून निष्पक्ष चौकशीची मागणी करत आहोत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
स्थानिक राजकारणात उलथापालथ
या प्रकरणानंतर धनंजय मुंडे, ज्ञानेश्वरी मुंडे, यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महादेव मुंडे यांचा मृत्यू अपघाती होता का? की ही एक नियोजित हत्या होती? – या प्रश्नांची उत्तरं सध्या संपूर्ण बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहेत.
जनतेचा रोष, राजकीय संघर्ष, आणि न्याय मिळवण्याची मागणी – या सगळ्यामुळे बीड जिल्ह्यातील तापलेलं वातावरण आणखी गंभीर होत चाललं आहे.
आता जनतेची मागणी – “CBI चौकशी होवो, आणि सत्य बाहेर येवो!”
संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, ही जनतेची ठाम मागणी आहे. राजकीय वर्तुळात या हत्येने हलचल निर्माण केली असून, अनेक नवे तपशील समोर येण्याची शक्यता आहे.